प्रिय मित्रांनो,
"वामन परुळेकर Vlogs" या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला नेहमी नवनवीन पर्यटन स्थळांची माहिती, मालवणी रेसिपी, कार व्लॉग्स, मोटो व्लॉग्स तसेच रोमांचक रोड ट्रिप्स दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या नजरेतून ही ठिकाणे अनुभवतांना त्यांचा इतिहास, संस्कृती आणि वैशिष्ट्ये जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळेल. यासोबतच गावच्या गोड आठवणी ताज्या करण्याबरोबरच निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
माझे व्लॉग्स तुम्हाला आवडले तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचा आशीर्वाद आणि साथ सदैव मिळो, हीच अपेक्षा! 🙏
#ratnagiri #vengurla #kolhapur #konkan #konkanvlogs
Waman Parulekar Vlogs
वेंगुर्ल्याच्या आठवणी: आजीच्या कथांतून उलगडलेला भूतकाळ
नमस्कार मित्रांनो,
अजून एक नवीन लेख घेऊन मी तुमच्या भेटीला आलो आहे. ब्लॉग लेखन मी यापूर्वीही करत होतो; मात्र काही कारणांमुळे मधल्या काळात त्यात खंड पडला. आता पुन्हा एकदा लिखाणाची सुरुवात केली आहे आणि त्या प्रवासाचा एक भाग म्हणून माझे काही लेख मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहे.
अलीकडेच 'गावडेश्वर मंदिर – माझ्या बालपणाच्या अविस्मरणीय आठवणी' आणि 'वेंगुर्ल्याचा चौकोनी पाव, काळ्या वाटाण्याची उसळ आणि माझ्या आठवणी' हे माझे लेख विविध सोशल मीडिया माध्यमांवर आणि ब्लॉगवर प्रकाशित केले होते. त्या लेखांना तुम्ही दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला मनापासून आनंद झाला. अनेकांनी आपल्या आठवणी शेअर केल्या, काहींनी जुन्या वेंगुर्ल्याबद्दल लिहिण्याची विनंती केली. त्यातूनच या नव्या लेखाचा जन्म झाला.
काही दिवसांपूर्वी मी वेंगुर्ला सफरीवर गेलो होतो. शहरात फेरफटका मारत असताना अचानक माझी गाडी त्या घरासमोरून गेली जिथे आम्ही लहानपणी राहत होतो — वाडकर यांचे घर. क्षणभर गाडी पुढे जात होती, पण मन मात्र अनेक वर्षे मागे गेले होते. त्या घराचा परिसर, आजूबाजूच्या गल्ल्या, मंदिरे, मित्रमंडळी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माझी आजी जनाबाई यांची आठवण मनात दाटून आली.
आजी ही माझ्यासाठी केवळ घरातील ज्येष्ठ व्यक्ती नव्हती, तर ती जणू चालते-बोलते इतिहासपुस्तक होती. वेंगुर्ल्यातील जुन्या कथा, लोकांच्या आठवणी, गावातील घडामोडी, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसंग आणि आमच्या कुटुंबाच्या स्मृतींचा खजिना तिच्याकडे होता. तिच्या तोंडून ऐकलेल्या अनेक गोष्टी आजही मनात ताज्या आहेत.
त्यापैकीच एक म्हणजे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील वसंत वासुदेव नाईक, यांच्याबद्दलची आहे. माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश राजवटीच्या काळात ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. स्वातंत्र्याची चळवळ गावागावांत पोहोचवणे, लोकांना जागृत करणे, देशभक्तीची भावना निर्माण करणे आणि स्वातंत्र्यलढ्याची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय होते.
आजी सांगायची की त्या काळात आजसारख्या सुविधा नव्हत्या. वीज नव्हती, रस्त्यांवर दिवे नव्हते आणि वाहतुकीची साधनेही अत्यंत मर्यादित होती. तरीही देशसेवेची जिद्द मात्र अफाट होती.
आजोबांकडे एक अतिशय विश्वासू कुत्रा होता. रात्रीच्या अंधारात गावोगावी जाताना त्या कुत्र्याच्या तोंडात कंदील दिला जाई. आजोबा स्वतः हातात काठी घेऊन चालत असत. विशेषतः रात्रीच्या वेळीच त्यांचे काम अधिक चालत असे. दिवसा ब्रिटिश प्रशासनाच्या नजरेत येण्याचा धोका असे; त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांप्रमाणे तेही रात्रीच्या शांततेत गावोगावी फिरत.
शुभ्र पांढरे धोतर, साधा पोशाख, हातात काठी आणि सोबत कंदील घेऊन चालणारा त्यांचा विश्वासू साथीदार. त्यांचे मित्र म्हणायचे वसंता सारस्वत असलास तरी रात्रीच्या अंधारात राखणदाराचा भास होतो रे. हे चित्र आजी इतक्या जिवंतपणे रंगवायची की ते ऐकताना माझ्या डोळ्यांसमोर तो संपूर्ण काळ उभा राहायचा.
गावागावांत जाऊन पत्रके वाटणे, लोकांशी संवाद साधणे, स्वातंत्र्याची गरज समजावून सांगणे आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृती करणे हे त्यांचे दैनंदिन कार्य होते. त्या कार्यासाठी त्यांना कोणतीही प्रसिद्धी, सन्मान किंवा मोबदला अपेक्षित नव्हता. देश स्वतंत्र व्हावा, एवढीच त्यांची इच्छा होती.
आज त्या काळाकडे मागे वळून पाहताना जाणवते की आपल्या स्वातंत्र्यामागे अशा असंख्य ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांचे योगदान आहे. इतिहासाच्या मोठ्या पुस्तकांमध्ये ज्यांची नावे नसतील, अशा अनेक साध्या माणसांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग देशासाठी अर्पण केला. माझे आजोबा त्यापैकीच एक होते.
मात्र दुर्दैवाने माझ्या आजोबांचे निधन खूप कमी वयात झाले. त्या वेळी माझी आई आणि तिची भावंडे अजून लहान होती. कुटुंबासाठी तो अत्यंत कठीण आणि दुःखद प्रसंग होता. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. परंतु अशा कठीण परिस्थितीतही माझी आजी जनाबाई खंबीरपणे उभी राहिली.
त्या काळात आजच्यासारखा सामाजिक किंवा आर्थिक आधार नव्हता. कुटुंबाकडूनही फारसा पाठिंबा मिळाला नाही. तरीही आजीने हार मानली नाही. आपल्या मुलांना चांगले आयुष्य मिळावे, त्यांचे शिक्षण व्हावे आणि ते स्वाभिमानाने जगावे यासाठी तिने अथक परिश्रम घेतले. कितीही संकटे आली तरी ती कधी खचली नाही. आपल्या जिद्दीने, कष्टाने आणि आत्मविश्वासाने तिने आपल्या मुलांना लहानाचे मोठे केले.
आज जेव्हा त्या काळाचा विचार करतो, तेव्हा तिच्या संघर्षापुढे मन आपोआप नतमस्तक होते. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत तिने ज्या धैर्याने संसार उभा केला, त्याला मी नेहमीच सलाम करतो. माझ्यासाठी जनाबाई आजी ही केवळ आजी नव्हती, तर जिद्द, कष्ट आणि मातृत्व यांचे मूर्तिमंत उदाहरण होती.
आजीच्या आठवणींमधून मला एक वेगळेच वेंगुर्ला पाहायला मिळाले. तिच्या गप्पांमधील वेंगुर्ला आणि माझ्या बालपणीचे वेंगुर्ला यांच्यामध्ये अनेक वर्षांचे अंतर होते. ती ज्या वेंगुर्ल्याचे वर्णन करायची, तेथील माणसे, चालीरीती, सण-उत्सव, बाजारपेठा आणि दैनंदिन जीवन यांचे चित्र खूप वेगळे होते. तिच्या गोष्टी ऐकताना मला जणू काळाच्या प्रवाहात मागे गेल्यासारखे वाटायचे. आमच्या लहानपणी त्या अनेक गोष्टी अस्तित्वात नव्हत्या किंवा बदलून गेल्या होत्या. त्यामुळे आजीच्या आठवणी माझ्यासाठी केवळ कौटुंबिक कथा नव्हत्या, तर जुन्या वेंगुर्ल्याचा एक मौल्यवान इतिहास होत्या.
आजी जनाबाईच्या गोष्टींमध्ये वेंगुर्ल्याइतकाच उल्लेख वारंवार यायचा तो तिच्या माहेरच्या गावाचा – आकेरीचा. आजचे आकेरी हे कुडाळ तालुक्यातील एक शांत आणि सुंदर गाव; पण आजीच्या कथांमधील आकेरी हे माझ्यासाठी एका वेगळ्याच काळाचे प्रवेशद्वार होते.
आकेरी हे तिचे माहेर. त्यामुळे त्या गावाशी तिचे भावनिक नाते होते. गप्पा मारताना, जुन्या आठवणी सांगताना किंवा एखादा प्रसंग वर्णन करताना आकेरीचा उल्लेख हमखास यायचा. विशेषतः आकेरीहून वेंगुर्ल्याला कसे येत असत, त्या काळातील प्रवास कसा असे, दळणवळणाची साधने कोणती होती, याबद्दल ती अनेक गोष्टी सांगायची.
आज आपण काही तासांत सहज प्रवास करतो; पण त्या काळातील प्रवास म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. आजी सांगायची की पहाटेच्या अंधुक प्रकाशात बैलगाड्यांचे ताफे घाटातून, सावंतवाडीकडून आणि इतर दूरच्या भागांतून वेंगुर्ल्याकडे निघत असत. त्या बैलगाड्यांना लावलेले घुंगरू दूरवरून ऐकू यायचे. पहाटेच्या शांत वातावरणात तो मंजुळ आवाज घुमत राहायचा आणि अनेक लोकांची जागही त्याने व्हायची.
या बैलगाड्या रिकाम्या नसत. त्यांच्यामध्ये विविध प्रकारचा माल भरलेला असे. काही गाड्या घाटातून किंवा सावंतवाडीकडून माल घेऊन वेंगुर्ला बंदराकडे येत असत, तर काही बंदरातून उतरवलेला माल घेऊन जात असत. त्या काळात वेंगुर्ला हे केवळ एक शहर नव्हते, तर संपूर्ण परिसराचे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते.
आजी सांगायची की त्या काळी घोडागाडी हेही एक प्रतिष्ठेचे वाहन होते. विशेष पाहुणे, अधिकारी किंवा मान्यवर व्यक्ती आल्यास त्यांना आणण्यासाठी घोडागाडी वेंगुर्ला बंदरावर पाठवली जायची. मात्र सर्वसामान्य माणसासाठी चालणे हाच सर्वांत विश्वासार्ह प्रवासाचा मार्ग होता.
"आम्ही बऱ्याचदा चालतच प्रवास करायचो," असे आजी अभिमानाने सांगायची. त्या काळी सायकल हेही दुर्मीळ साधन होते. फार कमी लोकांकडे सायकल असायची. बैलगाडी मिळेलच याची खात्री नसायची. त्यामुळे अनेकजण पहाटे घरातून निघून मैलोनमैल चालत आपला प्रवास पूर्ण करायचे.
प्रवासादरम्यान जेवण किंवा नाश्त्याचीही वेगळी पद्धत होती. वाटेत काही ठराविक घरे असत. तिथे प्रवाशांना जेवण किंवा विश्रांती मिळत असे. त्याची किंमत नेहमी पैशातच दिली जाई असे नाही. अनेकदा तांदूळ, धान्य किंवा इतर आवश्यक वस्तू देऊन त्या सेवांचा मोबदला दिला जायचा. वस्तुविनिमयाची ही पद्धत त्या काळच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होती. पैशाचा वापर मुख्यतः बाजारपेठांमध्ये आणि मोठ्या व्यवहारांमध्ये होत असे.
आजीच्या आठवणींमधील सर्वात रंगतदार भाग म्हणजे वेंगुर्ला बंदराचे वर्णन. तिच्या मते त्या काळातील वेंगुर्ला बंदर अत्यंत गजबजलेले होते. विविध देशांतील व्यापारी जहाजे, गलबते, होड्या आणि मोठ्या बोटी येथे येत असत. अरब व्यापारीही तिने पाहिल्याचे सांगितले होते. समुद्रमार्गे व्यापार मोठ्या प्रमाणावर चालत असे. प्रवासी वाहतूकही होत असे आणि अनेक वेंगुर्लेकर मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी समुद्री मार्गाचा वापर करत असत.
वेंगुर्ल्याच्या माणिक चौकाबद्दलही तिच्या अनेक आठवणी होत्या. तिच्या सांगण्यानुसार त्या ठिकाणी आज जिथे व्यासपीठ आहे, त्या भागात पूर्वी मोठा पाण्याचा हौद होता. त्या हौदाजवळ सार्वजनिक नळ होते आणि अनेक लोक तिथून पाणी भरत असत. या माहितीचा माझ्याकडे कोणताही अधिकृत पुरावा नाही; परंतु आजीकडून आणि इतर काही ज्येष्ठ व्यक्तींकडून मी हे वारंवार ऐकले आहे.
माणिक चौक हा त्या काळात अत्यंत गजबजलेला व्यापारी भाग होता. आज ज्या काही दुकानांची आपल्याला सवय आहे, त्याही आधी तेथे अनेक व्यापारी पेढ्या आणि दुकाने होती, असे आजी सांगायची. विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी-विक्री तिथे होत असे. समुद्रमार्गे आलेला माल आणि घाटातून आलेल्या वस्तू यांची देवाणघेवाण येथे चालत असे.
आजीच्या या गोष्टी ऐकताना मला नेहमी वाटायचे की ती ज्या वेंगुर्ल्याचे वर्णन करत आहे, ते आणि आजचे वेंगुर्ला यांच्यामध्ये जणू अनेक शतके दडली आहेत. तिच्या आठवणींमधील वेंगुर्ला म्हणजे गजबजलेले बंदर, बैलगाड्यांचे ताफे, घुंगरांचा नाद, चालत प्रवास करणारी माणसे, वस्तुविनिमयाची अर्थव्यवस्था आणि समुद्राशी घट्ट जोडलेले जीवन.
आज त्या काळातील बऱ्याच गोष्टी अस्तित्वात नाहीत. रस्ते बदलले, वाहतूक बदलली, बाजारपेठा बदलल्या आणि जीवनशैलीही बदलली. पण आजीच्या कथांमधून जपला गेलेला तो जुना वेंगुर्ला आजही माझ्या मनात तितकाच जिवंत आहे. तिच्या आठवणींमुळेच मला माझ्या गावाचा असा इतिहास समजला, जो कदाचित कोणत्याही इतिहासग्रंथात सापडणार नाही.
आजीच्या स्मृतींच्या या शिदोरीत अजूनही अनेक कथा, अनेक प्रसंग आणि असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. काळाच्या ओघात त्यांपैकी काही विस्मृतीत गेल्या असतील, तर काही अजूनही मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या आहेत. त्या आठवणी पुन्हा कधी जाग्या झाल्या, एखादा प्रसंग आठवला किंवा आजीच्या गप्पांमधला एखादा धागा सापडला, तर त्या नक्कीच लेखरूपाने तुमच्यापर्यंत घेऊन येईन. कारण या केवळ माझ्या कुटुंबाच्या आठवणी नाहीत, तर जुन्या वेंगुर्ल्याच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि जीवनशैलीची जपलेली अमूल्य ठेव आहे.
- प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर
1 day ago | [YT] | 15
View 4 replies
Waman Parulekar Vlogs
वेंगुर्ल्याचा चौकोनी पाव, काळ्या वाटाण्याची उसळ आणि माझ्या आठवणी
आज पुन्हा एकदा वेंगुर्ल्यातील एका खास कोकणी नाश्त्याचा आस्वाद घेण्याचा योग आला. साकवाजवळील महालक्ष्मी हॉटेलमध्ये गरमागरम काळ्या वाटाण्याची उसळ आणि चौकोनी पाव असा नाश्ता केला. सोबत कांदाभजीही होती, त्यामुळे अगदी दुग्धशर्करा योगच जुळून आला!
वेंगुर्ल्यातील चौकोनी पाव ही केवळ एक खाद्यपदार्थाची गोष्ट नाही, तर येथील ओळखीचा आणि परंपरेचा भाग आहे. या पावाची खास चौकोनी रचना, त्याची चव आणि त्यामागील जुनी बेकरी परंपरा यामुळे तो वेंगुर्ल्याची खासियत मानला जातो. काही अभ्यासकांच्या मते वेंगुर्ल्याच्या प्राचीन इतिहासाचा प्रभाव या पावाच्या परंपरेवर दिसून येतो. आजही अनेक पर्यटक खास चौकोनी पाव आणि कोकणी नाश्त्याचा अनुभव घेण्यासाठी वेंगुर्ल्यात येतात.
काळ्या वाटाण्याची उसळ आणि चौकोनी पाव हे कोकणातील एक अप्रतिम खाद्यजोड आहे. विशेषतः सकाळच्या नाश्त्यात या जोडीची सर कुठल्याच आधुनिक फास्ट फूडला येणार नाही. साधे पदार्थ, पण चवीत अफाट श्रीमंती!
हा नाश्ता खाताना मात्र माझे मन नकळत बालपणात जाऊन पोहोचले.
लहानपणी आम्ही वेंगुर्ल्यात राहत असताना रामेश्वर मंदिराजवळ रेडकर यांचे एक छोटेसे हॉटेल होते. बाबांसोबत कधीतरी तिकडे जाण्याचा योग आला की काळ्या वाटाण्याची किंवा हिरव्या वाटाण्याची उसळ, चौकोनी पाव, भजी आणि इतर कोकणी पदार्थ खाण्याची पर्वणीच असायची. विशेषतः संध्याकाळची गरमागरम बटाटा भजी आजही जिभेवर रेंगाळत आहेत.
त्यानंतर मुख्य बाजारपेठेतील तृप्ती हॉटेल हे आमचे आणखी एक आवडते ठिकाण होते. पूर्वस मंदिराजवळ आणि बाजारपेठेतील इतर छोट्या हॉटेलांमध्ये मिळणारी बटाटा भजी, कांदाभजी, आंबोळी-उसळ आणि उसळपाव हा आमच्या बालपणाचा अविभाज्य भाग होता. त्या काळी मोठमोठी रेस्टॉरंट्स नव्हती, पण प्रत्येक हॉटेलची स्वतःची एक वेगळी चव आणि ओळख होती.
मच्छी मार्केटमधील रेडकर यांचे हॉटेलही अशाच आठवणींनी भरलेले आहे. दुपारच्या वेळी तिकडे गेलो की उसळपाव, भजी आणि इतर कोकणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचो. मच्छी मार्केटचा गजबजाट, बाहेरची वर्दळ आणि आत मिळणारा साधा पण अप्रतिम नाश्ता आजही डोळ्यांसमोर उभा राहतो.
गाडी अड्ड्याकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या दुकानातही मी अनेकदा उसळपाव खाल्ला आहे. त्या जागेची चव आणि वातावरण आजही स्मरणात आहे. खरं तर वेंगुर्ल्यात अशा आठवणींशी जोडलेल्या अनेक खाद्यजागा आहेत. मी उल्लेख केलेली ही काही ठिकाणे; पण प्रत्येक वेंगुर्लेकराकडे अशा अनेक कथा आणि आठवणी असतील.
आज महालक्ष्मी रेस्टॉरंटमध्ये बसून काळ्या वाटाण्याची उसळ आणि चौकोनी पाव खाताना त्या सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. बालपणातील हॉटेल्स, बाबांसोबतचे फेरफटके, मित्रांसोबत खाल्लेल्या भज्या, बाजारपेठेतील गजबज आणि वेंगुर्ल्याची खास खाद्यसंस्कृती — सगळं काही पुन्हा एकदा मनात उभं राहिलं.
जर तुम्ही कधी वेंगुर्ल्यात आलात, तर समुद्रकिनारे, मंदिरे आणि निसर्ग पाहाच; पण त्यासोबत काळ्या वाटाण्याची उसळ, चौकोनी पाव आणि गरमागरम कांदाभजी यांचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. कारण वेंगुर्ल्याची खरी चव केवळ पदार्थांमध्ये नाही, तर त्या पदार्थांशी जोडलेल्या आठवणींमध्ये आहे.
- प्रा. वामन राधाकृष्ण परुळेकर
5 days ago | [YT] | 31
View 6 replies
Waman Parulekar Vlogs
An evening in Vengurla
6 days ago | [YT] | 11
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
माणिक चौक Vengurla Hostoric Place
1 week ago | [YT] | 15
View 2 replies
Waman Parulekar Vlogs
गावडेश्वर मंदिर – माझ्या बालपणाच्या अविस्मरणीय आठवणी
wamanparulekar.blogspot.com/2026/05/blog-post.html…
1 week ago | [YT] | 9
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
HOTEL PAVHNER NEAR KANKAVALI
1 week ago | [YT] | 7
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
Hotel Pavahner Near Kankavali
1 week ago | [YT] | 17
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
A hotel on NH 66. Average food. I loved veg food. Non veg is ok not upto the mark. Ambiance is really good. And ample parking facility.
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
3 weeks ago | [YT] | 9
View 0 replies
Waman Parulekar Vlogs
Identify this place 🙂 my one of the most favorite place in vengurla 😃
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Load more